मुंबईकरांनो, सावधान! डेंग्यूची सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईतच

राज्यामध्ये डेंग्यूच्या १२३७ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यातील सर्वाधिक म्हणजे, २७ टक्के रुग्णांची नोंद मुंबईमध्ये झाली आहे. मागील वर्षी राज्यात डेंग्यूचे ८०७ रुग्ण नोंदविण्यात आले होते, त्यातील ५३ टक्के रुग्ण मुंबईतील होते. एकूण राज्यातील डेंग्यूरुग्णसंख्येची नोंद पाहिली तर त्यात मुंबईमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसते.

मुंबईमध्ये ३३५ तर, नाशिकमध्ये ८८, सांगलीमध्ये ७२, सोलापूर येथे ३२, कोल्हापूरमध्ये ३० तर पुणे येथे २१ डेंग्यूरुग्णांची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये १७ तर औरंगाबादमध्ये १४, नांदेडमध्ये, ठाणे येथे ११ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.

डेंग्यूच्या संसर्गामध्ये अंगदुखी, ताप, डोकेदुखी ही लक्षणे प्रामुख्याने जाणवतात. आठ ते चौदा दिवसांमध्ये या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये फरक पडतो. मागील काही दिवसांमध्ये उष्मा प्रचंड वाढल्यामुळे डासांची पैदासही मोठ्या प्रमाणात झाली आहे. डासांची उत्पत्तीस्थळे वाढू नयेत यासाठी पालिकेने काळजी घ्यायला हवी, असे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आशीष पाटील यांनी सांगितले.

पावसाळ्यामध्ये धूरफवारणी तसेच डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे अवघड होते. त्यामुळे आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये योग्यवेळी आजारासंदर्भात रिपोर्टिंग करणेही गरजेचे आहे याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.

घरातील कुंड्या, फुटलेले टायर्स तसेच नारळाच्या करवंट्यामध्ये डास अंडी घालू शकतात. पाणी साठून राहणार नाही अशी काळजी घ्यावी, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे.


हेही वाचा

केईएममध्ये हिमोफिलिया रुग्णांना एकाच छताखाली उपचार

महाराष्ट्र: 5 जिल्ह्यांमध्ये मलेरियाच्या शून्य रुग्णांची नोंद

पुढील बातमी
इतर बातम्या