कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण मुंबईतच आढळून येत आहेत. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनावर मात देण्यासाठी लस बनवण्यावर अनेक देश संशोधन करत आहेत. पण कोणत्याच देशाला म्हणावं तसं यश मिळालं नसल्याचंच सध्याची परिस्थिती पाहता म्हणावं लागेल. मात्र योगगुरू रामदेव बाबा यांची कंपनी पंतजलीनं या महामारीवर मात करू शकणारं औषध तयार केल्याचा दावा केला आहे.
आयुर्वेदिक औषधाचं नाव कोरोनिल आहे. पतंजलीचा दावा आहे की हे संशोधन पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट (पीआरआय), हरिद्वार अँड नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एनआयएमएस), जयपूर यांनी संयुक्तपणे केले आहे. हे औषध दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वार यांनी तयार केलं आहे.
पतंजली योगपीठाचे सरचिटणीस आणि योग शिक्षक बाबा रामदेव यांचे सहयोगी आचार्य बालकृष्ण म्हणाले होते की, यावेळी कोरोना विषाणू भयावह स्थितीत आहे. कोरोना विषाणूचा शोध लागला तेव्हापासूनच पतंजली संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकानं त्याच्या औषधाचा शोध सुरू केला होता. तुळस, अश्वगंधा तसंच अनेक प्रकारच्या रसापासून त्यांनी हे औषध बनवले आहे. हे औषध हजारो कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर वापरलं गेलं आहे. त्यांचा पाठपुरावा करण्यात आला असून ते सर्वजण बरे झाले आहेत.
औषध लाँच करताना रामदेव म्हणाले की, आज एलोपॅथिक सिस्टम मेडिसन पुढे आहे. आम्ही कोरोनिल बनवलं आहे. ज्याची २८० लोकांवर चाचणी केली. ३ दिवसांच्या आत ६५ टक्के रुग्ण बरे झाले. तर ७ दिवसात १०० टक्के लोक बरे झाले. आम्ही संपुर्ण रिसर्च करून हे औषध तयार केलं आहे. औषधाचा १०० टक्के रिकव्हरी रेट असून, शून्य टक्के मृत्यूदर आहे.
त्यांनी सांगितले की, या औषधाच्या निर्मितीसाठी केवळ स्वदेशी वस्तूंची वापर केला आहे. गिलॉय, अश्वगंधा, तुळस, श्वासरी या गोष्टींचा वापर केला आहे. पुढील ७ दिवसात हे औषध पंतजली स्टोरमध्ये उपलब्ध होईल. याशिवाय अॅप देखील लाँच केलं जाणार आहे, ज्याच्या मदतीनं औषध घरी पोहचेल.
असं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ज्यांचा या औषधावर विश्वास आहे त्यांनीच हे घ्यावं असं स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, अनेक कंपन्या बाजारात कोरोनावर औषध आणत आहेत. त्यामुळे ज्यांचा विश्वास आहे, त्यांनीच हे औषध घ्यावं.
हेही वाचा