दहिसर ते भाईंदर ५० मिनिटांचा प्रवास आता 15 ते 20 मिनिटांत

दहिसर ते भाईंदर जलद प्रवासासाठी मुंबई महापालिकेकडून दहिसर-भाईंदर उन्नत जोडरस्ता बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी एल अँड टी, जे. कुमार आणि एफकॉन या बड्या कंपन्यांनी निविदा भरून रूची दाखवली आहे. सर्वांत कमी रक्कमेची बोली सादर करणाऱ्या कंपनीला हे काम देण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचा खर्च सुमारे तीन हजार कोटी रुपये आहे. याचे काम पुढील वर्षी सुरू होऊन हा मार्ग २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे दहिसर ते भाईंदर प्रवास १५ ते २० मिनिटांत शक्य होणार आहे.

मुंबईतून वसई, विरार, पालघरसह गुजरातपर्यंत जाताना वाहनचालकांना दहिसर ते भाईंदरदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. यातून सुटका व्हावी आणि विनाअडथळा जलद प्रवास व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मीरा-भाईंदर महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

हा मार्ग दहिसर पश्चिमेला कांदरपाडा मेट्रो स्थानक ते भाईंदर पश्चिमेला उत्तनपर्यंत असेल. ऑक्टोबर २०२२मध्ये यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर अखेर ११ जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.

दहिसर-भाईंदर प्रस्तावित उन्नत मार्ग पाच किमी लांब आणि ४५ मीटर रुंद असेल. या मार्गावर प्रत्येकी चार लेन असतील. या प्रकल्पाची अंदाजे किंमत तीन हजार १८६ कोटी रुपये आहे.

हा मार्ग २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. वर्सोवा ते दहिसरपर्यंत सागरी किनारा मार्ग होणार असून, तो या उन्नत मार्गाला जोडण्यात येईल.


हेही वाचा

कल्याण-तळोजा मेट्रो आता नवी मुंबईपर्यंत! बेलापूर-पेंधर मार्गिकेशी जोडली जाणार

घोडबंदर रोडवर 18 जुलैपर्यंत अवजड वाहनांना बंदी

पुढील बातमी
इतर बातम्या