वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान करणं भाजपातील ३ प्रवक्त्यांना चांगलंच भोवलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा मलिन व्हायला नको, असं धोरण स्वीकारत भाजपाने राम कदम, अवधूत वाघ आणि मधू चव्हाण यांना प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे.
राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानानंतर मुंबईसह राज्यभर वाद निर्माण झाला. हे प्रकरण अगदी पोलिस ठाण्यापासून महिला आयोगापर्यंत गेलं. या प्रकरणी राम कदम यांनी जाहीर माफी मागावी लागली.
दुसरीकडे मधू चव्हाण यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे. अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११ वा अवतार असल्याचं ट्विट करत सर्वत्र खळबळ उडवून दिली होती.
या तिन्ही प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानामुळे भाजपा गेल्या काही दिवसांत चांगलंच अडचणीत आलं आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना आणखी कोणत्याही अडचणी वाढू नये यादृष्टीनं भाजपानं या तिघांवरही बोलण्यापासून तूर्तास मनाई केल्याचं समजत आहे.
हेही वाचा-
#MeToo: नाना 'तसे' नाहीत, राज यांनी केली पाठराखण!
म्हाडा, मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल
'राम कदम नरमले, महिलांचा सन्मान करू म्हणाले...'