घाटकोपर इथं दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अखेर भाजपा आमदार राम कदम राज्य महिला आयोगासमोर नमले आहेत. राम कदम यांनी बिनशर्त माफी मागितली असून भविष्यात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी कार्यरत राहण्याची हमी दिल्याची महिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.
घाटकोपरच्या दहीहंड उत्सव कार्यक्रमात ''मुलगी तयार नसेल तर पळवून आणून लग्नासाठी मदत करू'', या राम कदम यांच्या वक्तव्यानंतर मुंबईसह राज्यभर खळबळ उडाली होती. राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. त्यानुसार घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तर महिला आयोगानंही त्यांना दणका दिला.
महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत महिला आयोगानं एका नोटीशाद्वारे राम कदम यांच्याकडे स्पष्टीकरण मागवलं होतं. त्यानुसार राम कदम यांनी याबाबतचा खुलास नुकताच आयोगाकडं सादर केला आहे.
या खुलाशानुसार त्यांनी या वक्तव्याप्रकरणी बिनशर्त माफी मागितली आहे. तर यापुढं महिलांचा कायम सन्मान करू अशी हमीही त्यांनी दिली आहे. आपण याप्रकरणी यापूर्वीही माफी मागितली आहे, असं म्हणत महिला आयोगाच्या माध्यमातून माता-भगिनींची बिनशर्त माफी मागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक स्त्री ही साक्षात लक्ष्मी असते हा संदेश रूजवण्यासाठी मी प्रयत्न करेन असंही, त्यांनी या खुलाशात म्हटलं आहे.
हेही वाचा-
राम कदमांच्या अडचणी वाढल्या, दोन याचिका दाखल
'विषय संपला' म्हणत भाजपाकडून कदम यांना 'माफी'?