Mira Bhayandar: कमी चाचण्यांमुळेच मिरा-भाईंदरमध्ये वाढताहेत रूग्ण- देवेंद्र फडणवीस

पनवेल, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भाईंदर अशा सर्वच ठिकाणी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यात व्यवस्थापनाचा अभाव आणि कमी प्रमाणात होणाऱ्या कोरोना चाचण्या जबाबदार असल्याचा ठपका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis visited mira bhayandar) यांनी राज्य सरकारवर ठेवला आहे. फडणवीस यांनी सोमवार ६ जुलै रोजी मिरा-भाईंदर येथील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भाईंदर पाडा येथील क्वारंटाईन सेंटर. पं. भीमसेन जोशी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांसोबत बातचीत केली. मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात जाऊन मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर, आयुक्त, पोलीस अधिक्षकांसोबत बैठक देखील घेतली. या बैठकीत कोरोना चाचण्यांचा अहवाल मिळण्यास लागणारा ३ दिवसांचा कालावधी खूप अधिक असल्याचं सांगत हा कालावधी कमी करून कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना केल्या. तसंच कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच रुग्णालय, क्वारंटाईन सेंटरमध्ये स्वच्छतेबाबत सूचनाही केल्या. 

हेही वाचा - हे सरकार नाही, सर्कस आहे- नितेश राणे

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील कोरोना संसर्गाच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचं प्रमाण फारच अधिक आहे. प्रति १० लाख लोकसंख्येमागे करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात नवव्या स्थानी आहे. कमी कोरोना चाचण्या हेच महाराष्ट्रातील कोरोनाची वाढ होण्यामागील मुख्य कारण असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

राज्यातील रुग्णसंख्येत मुंबई आणि एमएमआरमध्ये ७० टक्के रुग्ण असून मृत्यूसुद्धा याच भागात अधिक झाले आहेत. पनवेल, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भाईंदर अशा सर्वच ठिकाणी कोरोना संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या वाढविण्याची खूप गरज आहे. शिवाय या चाचण्यांचे अहवाल देखील लगेच आले पाहिजेत, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील मृत्यूदर वाढणं ही अधिक चिंताजनक बाब आहे. मी सातत्याने सांगतो आहे की, अजूनही खरी मृत्यूसंख्या पुढे आली नाही. मुंबईतील ४०० मृत्यू आणखी पुढे आलेले नाहीत.  रुग्ण व्यवस्थापन देखील कमी पडत आहे. आरोग्य सेवकांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. ठाण्यातून २ ते ३ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे नातेवाईक मला आज भेटले. महापालिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळायला हवी. खाजगी रुग्णालयांकडून लूट थांबविणं आवश्यक आहे. आयसीसीयू बेड कमी पडत असल्याची तक्रारही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा - मुंबईत दररोज फक्त ४ हजार चाचण्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

पुढील बातमी
इतर बातम्या