शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी ३५४ कोटी रुपये बिल्डरला गिफ्ट दिले

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावरील आरोपांचा धडाका  सुरूच ठेवला आहे. मुंबईत पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर जमीन विक्री घोटाळ्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 

पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, राज्यातील ठाकरे सरकार हे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं आहे. दहिसर येथील जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने अवघ्या २ कोटी ५५ लाखांत घेतली ती जमीन मुंबई महापालिका ९०० कोटी रुपयांना विकत घेण्याची तयारी करत आहे. यापैकी ३५४ कोटी रुपये उद्धव ठाकरे यांनी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी या बिल्डरला गिफ्ट म्हणून दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे माझ्याकडं असून लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत हे ऐकत असतील तर त्यांनी स्पष्टपणे ऐकावं, असंही सोमय्या म्हणाले.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, किरीट सोमय्यांचा प्रश्न

मागच्या पत्रकार परिषदेत मी दिवंगत इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा नाईक आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारांचे २१ सातबारा उतारे सादर केले होते. मला अधिकारी माहिती देत नसले, तरी लोकंच स्वत:हूनच माहिती आणून देत आहेत. यातले आणखी ९ सातबारा उतारे मी सादर करत आहे. म्हणजेच ठाकरे कुटुंबीय आणि नाईक कुटुंबीयांचे एकूण ३० जमीन व्यवहार झाले असून आणखी १० असे एकूण ४० जमीन व्यवहार ठाकरे कुटुंबाचे आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

आम्ही पुराव्यासह आरोप केला आहे, पण शिवसेनेच्या नेत्यांमध्ये उत्तरं देण्याची हिंमत नाही. त्यामुळं ते शिवीगाळ करत आहेत. मी दिलेली कागदपत्रं चुकीची असतील तर मला जेलमध्ये टाका किंवा खुलासा करा. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल पुरावे देऊनही उद्धव ठाकरेंनी कारवाई केली नाही. अनिल परब यांनी म्हाडाची जमीन खाल्ल्याने म्हाडाने त्यांना नोटीस दिली आहे. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करावी, असं जाहीर आव्हान देखील किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. 

(bjp leader kirit somaiya allegations dahisar land scam on maharashtra cm uddhav thackeray)

हेही वाचा- महाराष्ट्रात दिवाळीनंतर सरकारचेच फटाके वाजणार- नारायण राणे
पुढील बातमी
इतर बातम्या