दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गेट वे आॅफ इंडिया इथं आंदोलन केलं. या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे भाजप नेते खवळले आहेत. त्यावरून शिवसेनेला काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम हवं आहे का? असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.
हेही वाचा- ‘फ्री काश्मीर’चं पोस्टर झळकवणारी तरूणी म्हणते…
गेट वे आॅफ इंडिया येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काश्मीरला स्वातंत्र्य द्या, अशी मागणी करणारं पोस्टर एका तरूणीने झळकावलं होतं. शिवाय ‘काश्मीरच्या आझादीचे’ नारेही या आंदोलनात लगावण्यात आले होते. असं असूनही शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा आरोप विरोधकांकडून शिवसेनेवर करण्यात येत आहे.
त्यावर तरूणीने झळकावलेलं ‘फ्री काश्मीर’चं पोस्टर काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईवरील बंदी उठवण्यासाठी होतं, असा खुलासा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. शिवाय काश्मीरला भारतापासून तोडण्याची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असंही ते म्हणाले.
मात्र शिवसेनेवर टीका करताना, सत्तेसाठी सिद्धातांशी किती समझोता करणार? शिवसेनेला काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लावणार का? असा प्रश्न सोमय्यांनी विचारला आहे.