आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा; भाजपचं नवाब मलिकांना खुलं आव्हान

नवाब मलिकांनी केंद्रावर जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. नवाब मलिक (nawab malik) यांच्याकडे याचे पुरावे असतील, तर त्यांनी आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागावी, असं खुलं आव्हान भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून नवाब मलिक यांनी केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत.

यासंदर्भात ट्विटरवरून पलटवार करताना केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे की, नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. नवाब मलिकांकडे या संदर्भातील पुरावे असतील, तर त्यांनी आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागावी. सध्याच्या घडीला महाविकास आघाडी सरकारनं दोषारोप करणं थांबवावं आणि कठीण काळात स्वत:चं काम करावं.

हेही वाचा- महाराष्ट्राला रेमडेसिवीर न दिल्यास औषध साठा जप्त करू, नवाब मलिकांचा कंपन्यांना इशारा

त्याचसोबत हा राज्य सरकारचा अधिकृत पवित्रा आहे का? तसं असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढं येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करायला हवी किंवा मंत्र्यांना असे बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यापासून रोखावं, असंही केशव उपाध्ये यांनी सुनावलं आहे.

दरम्यान महाराष्ट्र (maharashtra) सरकारने रेमडेसिवीर पुरवणाऱ्या ७ औषध कंपन्यांशी संपर्क साधून रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केल्यानंतर, महाराष्ट्राला औषध द्यायचं नाही, अन्यथा तुमचे परवाने रद्द केले जातील, अशी केंद्र सरकारने धमकी दिल्याची माहिती या कंपन्यांनी दिली आहे. या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

तसंच ही काय परिस्थिती या देशात केंद्र सरकारने निर्माण करून ठेवली आहे? आम्ही त्यांना सांगू इच्छितो की लोकांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची असणारी ही औषधं आम्हाला विकण्याची परवानगी त्यांना द्यावी, अन्यथा महाराष्ट्राच्या जमिनीवर असलेली ही औषधं एफडीएच्या माध्यमातून जप्त करून जनतेला वाटप करण्याचं काम केलं जाईल. याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असा इशारा देखील नवाब मलिक यांनी दिला आहे.

(bjp maharashtra spokesperson keshav upadhye reply nawab malik on allegations remdesivir supply)

हेही वाचा- कुंभमेळ्याहून लोकं 'कोरोना' प्रसाद घेऊन येतायत - किशोरी पेडणेकर

पुढील बातमी
इतर बातम्या