महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर परवाना जप्त केला जाईल, अशी धमकी केंद्र सरकारने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही, तर सध्याच्या आणीबाणीच्या काळात लोकांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचं असलेलं हे औषध न मिळाल्यास साठा जप्त करू, असा इशारा देखील मलिक (nawab malik) यांनी कंपन्यांना दिला आहे.
महाराष्ट्रात (maharashtra) कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रूग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लसींचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. राज्य सरकार यासाठी वारंवार केंद्राकडे पुरवठ्याची मागणी करत असतानाही केंद्राकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यातच नवाब मलिका यांच्या गंभीर आरोपामुळे पुन्हा एकदा केंद्र विरूद्ध राज्य असा नवा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी केंद्रावर हे गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये नवाब मलिक म्हणतात, भारतात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणारे १६ निर्यातदार आहेत. या निर्यातदारांकडे रेमडेसिवीरच्या २० लाख वायल्स आहेत. मात्र या इंजेक्शनचं उत्पादन करणार्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकण्यात यावं, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत.
हेही वाचा- कुंभमेळ्याहून लोकं 'कोरोना' प्रसाद घेऊन येतायत - किशोरी पेडणेकर
There are 16 export oriented units in our country that have 20 Lakh vials of #Remdesivir, since exports are now banned by the government, these units are seeking permission to sell this medicine in our country but central government is denying the same. (1/3)
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 17, 2021
महाराष्ट्र सरकारने या औषध कंपन्यांशी संपर्क साधून रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केल्यानंतर, महाराष्ट्राला औषध द्यायचं नाही, अन्यथा तुमचे परवाने रद्द केले जातील, अशी केंद्र सरकारने धमकी दिल्याची माहिती या कंपन्यांनी दिली आहे. या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
ही काय परिस्थिती या देशात केंद्र सरकारने निर्माण करून ठेवली आहे? आम्ही त्यांना सांगू इच्छितो की लोकांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची असणारी ही औषधं आम्हाला विकण्याची परवानगी त्यांना द्यावी, अन्यथा महाराष्ट्राच्या जमिनीवर असलेली ही औषधं एफडीएच्या माध्यमातून जप्त करून जनतेला वाटप करण्याचं काम केलं जाईल. याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असा इशारा देखील नवाब मलिक यांनी दिला आहे.
त्याचसोबत महाराष्ट्रात १४०० किलो लिटर्स आॅक्सिजनची गरज असताना, राज्यात केवळ १२५० किलो लिटर्स आॅक्सिजन उत्पादित होतो. खासगी स्टील कंपन्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेत, ते आॅक्सिजन पुरवठा करत आहेत, परंतु तो देखील कमी पडत आहे. त्यामुळे केंद्राने जबाबदारी घेतला महाराष्ट्राला अधिकाधिक आॅक्सिजनचा साठा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
(maharashtra minister nawab malik alleges central government on remdesivir injection supply)
हेही वाचा- जाणून घ्या कुठला मास्क अधिक प्रभावी? चौथ्या नंबरचा मास्क कधीच वापरू नये