खड्ड्यांनी जीव मेटाकुटीला आणलाय, राष्ट्रवादी ‘सेल्फी विथ खड्डा’ का काढत नाही?

खड्ड्यात हरवलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरुन मुंबईत परतणाऱ्या आमच्या चाकरमान्यांच्या कंबरेवर इलाज करण्यासाठी मुंबईच्या महापौरांनी आता विशेष व्यवस्था करावी! कोकणी माणसावर कुठला राग काढताय? असा प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

तसंच गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा "स्तुत्य उपक्रम" का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना यावर्षी एवढं का छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली दिसत नाही का? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसलाही डिवचलं आहे.

हेही वाचा - एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास- आशिष शेलार

आशिष शेलार यांनी मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या बाबतीत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, सरकारच्या आडमुठ्या धोरणातून मार्ग काढत कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी आपल्या गावी पोहोचला. त्या चाकरमान्यांचा जीव मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी जीव मेटाकुटीला आणला आहे. मुंबई-गोवा महामार्ग पनवेल ते चिपळून पूर्णपणे उखडून गेला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह डांबर शिल्लक राहिलेला नाही. सर्वत्र खड्डे, खडी अशा अवस्थेत हा महामार्ग असून रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. खेड्यातील कच्च्या रस्त्यापेक्षा वाईट आणि दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे, असं आशिष शेलार यांनी नमूद केलं आहे. 

दरवर्षी पावसामुळे पडलेले खड्डे गणेशोत्सव काळात बुजवण्यात येतात. मात्र यावेळी राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्यांना कंबरेचे आजार होती की काय? अशी भीती वाटत आहे. कोकणातील माणसाला शारिरीक मानसिक त्रास दिल्याचा आम्ही निषेध करतो. एक तर सरकारने हे खड्डे त्वरीत बुजवावेत किंवा मुंबईच्या महापौरांनी चाकरमान्यांच्या कंबरेवर इलाज करण्याची विषेश व्यवस्था करावी, अशी मागणी देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

हेही वाचा - रेडी रेकनरच्या दरांची फाईल कुठे अडकली? आशिष शेलारांचा सरकारला सवाल 
पुढील बातमी
इतर बातम्या