लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. हा राजीनामा मंजूर करण्यात आला असून राज्यातील काँग्रेसची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्याचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर प्रत्येक प्रदेशाध्यक्षाने पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला पाहिजे, असं मत व्यक्त करत चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. तर राहुल गांधी यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सर्वच प्रमुख नेते प्रयत्न करत होते. त्यामुळे राहुल यांनी नेमका राजीनामा दिला की नाहीय, यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही बराच संभ्रम निर्माण झाला होता. परंतु राहुल यांनी ट्विटरवर व्यक्त होत, मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही, असं स्पष्ट करत अध्यक्षपदाबाबतच्या संभ्रमावरील पर्दा दूर सारला आहे.
मी आता पक्षाचा अध्यक्ष राहिलेलो नाही. मी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. काँग्रेस कार्यकारी समितीने आता नवा अध्यक्ष नियुक्त करावा. मी या प्रक्रियेत कुठेही नसेन, असं राहुल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही चार पानी पत्र पोस्ट करून आपलं म्हणणं मांडलं आहे. सोबतच आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी संसद सदस्य आणि काँग्रेस सदस्य इतकाच उल्लेख ठेवला आहे.
येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन थोरात यांच्या जोडीला ३ कार्याध्यक्ष देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्यात हर्षवर्धन पाटील, के.डी. पाडवी आणि अमित देशमुख यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु राहुल गांधी ४ जुलै रोजी भिवंडीला येत असल्याने त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करायला नको म्हणून या नावांची घोषणा ५ जुलै रोजी होण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जात आहे.
हेही वाचा-
पावसाळी अधिवेशनात २१ विधेयकं पारित
पावसावर राऊतांची कविता, मुंबईकर नाराज