भाजपच्या आयटी सेलने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी काही व्यावसायिक एजन्सींच्या मार्फत हजारो बनावट ट्विटर, फेसबुक अकाऊंट बनवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी कट रचला. हा प्रकार म्हणजे नव दहशतवाद असून यामागचा खरा मास्टरमाइंड शोधण्यासाठी एसआयटीची स्थापना करून सोशल मीडियाचं रॅकेट उद्धवस्त करावं, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. (congress spokesperson sachin sawant meet mumbai police commissioner parambir singh and demands to probe BJP driven social media conspiracy)
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवार ७ आॅक्टोबर २०२० रोजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचं निवेदन दिलं. या शिष्टमंडळात पक्ष प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, रत्नाकर सिंग उपस्थित होते. तसंच या कटात सामील कंपन्यांची नावं आणि डेटा देखील काँग्रेसकडून पुढील तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला आहे.
हेही वाचा- शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स, सरनाईकांचा विरोधकांना टोला
या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास हे महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. ट्विटर आणि फेसबुकच्या पॅटर्ननुसार कोणताही सामान्य वापरकर्ता ३ महिन्यांत ४० हजार ट्वीट/पोस्ट करू शकत नाही. यातील बहुतांश ट्विटर हँडलवरून दर मिनिटाला २५ ट्विट्स झाल्याचं दिसते. हे सर्व ट्विट साधारणपणे एकाच विषयाच्या संदर्भात करण्यात आलेले आहेत. सुशांत सिंग राजपूत (SSR) असे त्यांचे हॅशटॅगही कॉमन आहेत, अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली.
सोशल मीडियावर ट्रेंड सेट करण्याची ही भाडोत्री पद्धत असून याच माहितीच्या आधारावर गोदी न्यूज चॅनेल्स जोरजोरात अपप्रचार करतात आणि त्यातूनच भाजपचे नेते कृत्रिम जनमत बनवण्याचा प्रयत्न करतात, हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, असंही सचिन सावंत यांनी सांगितलं.