हनुमानासारखं पर्वत उचलायला घराबाहेर पडू नका- अजित पवार

उद्या ८ एप्रिलला हनुमान जयंती (Hanuman jayanti) आहे. हनुमानानं लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी औषधी वनस्पती असलेला पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. परंतु सद्यस्थितीत कोरोनापासून बचाव करायचा असेल, तर हनुमानासारखं पर्वत उचलण्याची नाही, तर घरीच थांबण्याची गरज आहे. त्यामुळे घरात राहूनच हनुमान जयंती साजरी करा. शिवाय मुस्लिम बांधवांनी देखील शब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये. घरातच प्रार्थना करावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी केलं आहे.

धार्मिक कार्य घरातच

कोरोनासंसर्गाची (coronavirus) साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - ‘कोरोनाशी लढताना उद्धव ठाकरेंसारख्या सेनापतीची गरज’

गंभीर गुन्हे दाखल करू

कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. बंदी आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल. करोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोनाप्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य संघटनेचं महत्वं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं त्यांनी जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना अजित पवार यांनी म्हटलं आहे.

'आरोग्यम् धनसंपदा’, आरोग्यासारखं धन नाही असं मानणारी आपली संस्कृती आहे, परंतु जागतिकिकरणाच्या काळात, आधुनिक जीवनपद्धतीत वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनं, सार्वजनिक, जागतिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे हे ‘करोना’संकटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा लक्षात आलं आहे. यापासून धडा घेऊन भविष्यात वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनं सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणसाठी आपण सर्वजण कटीबद्ध होऊया, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

हेही वाचा - राज्यात ५ दिवसांत १ लाख ६३ हजार मेट्रिक टन धान्याचं वाटप
पुढील बातमी
इतर बातम्या