एकाबाजूला जागा वाटपाच्या चर्चेत भाजपसोबत वाटाघाटी करताना नाकीनाऊ आलेल्या शिवसेनेला आता बंडोबाला थंड करण्यात आपली उर्जा खर्च करावी लागू शकते. याचा ट्रेलर सोमवारी दिसून आला. वडाळा मतदारसंघ भाजपाच्या वाटेला जाण्याची चिन्हे असल्याने शिवसनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव नाराज झाल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती झाली नाही आणि वेगवेगळं लढण्याची वेळ आलीच, तर तयारी असावी म्हणून भाजपा आणि शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या आयारामांची मेगा भरती करून घेतली. त्यामुळे या आयारामांना तिकीट देताना आता दोन्ही पक्षांची तारंबळ उडणार आहे.
जागा वाटपात शिवसेना - भाजपात ज्या काही मोजक्या जागांवरून खल सुरू होता. त्यापैकी एक जागा होती, ती वडाळ्याची. वडाळ्यातून कालिदास कोळंबकर सलग ७ वेळा जिंकले आहेत. त्यांचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. ते आता भाजपवासी झाल्याने हा मतदारसंघ सोडण्याची अजिबात शक्यता नाही.
तर दुसऱ्या बाजूला मागील काही वर्षांमध्ये या मतदारसंघात चांगली पकड बसवली आहे. शिवसेनेला जागा मिळाल्यास त्याच या मतदारसंघातून लढण्याची शक्यता होती. परंतु हा मतदारसंघत भाजपच्या पारड्यात जाण्याचीच जास्त शक्यता असल्याने श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. जाधव यांनी खासदार राहुल शेवाळेंसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आपली नाराजी देखील उघड केल्याची सूत्रांची माहिती आहे.
हेही वाचा-
वरळीतून आदित्य ठाकरेंची उमेदवारी निश्चित? म्हणून शरद पवारांकडे फिल्डींग
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ८० जणांना उमेदवारी जाहीर