नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त साधून शिवसेनेनं ८०हून अधिक उमेदवारांना एबी अर्जांचं वाटप केलं आहे. भाजपबरोबर युतीची अधिकृत घोषणा होण्याआधीच शिवसेनेनं उमेदवारांची घोषणा केली. तसंच, यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवणार आहे. त्यानुसार, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करीत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेनेनं केलेली नाही.
या आमदारांना पुन्हा उमेदवारी
औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट, कोल्हापूर-उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी मतदारसंघातून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. करवीरमधून चंद्रदीप नरके, शाहूवाडीतून सत्यजित पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरोळमधून उल्हास पाटील या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.
चंदगडमधून संग्राम कुपेकर, कागलमधून संजय घाडगे हे शिवसेनेकडून रिंगणात असणार आहेत. तसंच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवारांना अर्जाचे वाटप केले. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून रवींद्र वायकर तर पुरंदरमधून विजय शिवतारे या मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा -
नवरात्रौत्सव निमित्त मुंबई पोलीस सज्ज
मनसे ५ ऑक्टोबरला फोडणार प्रचाराचा नारळ?