विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात शिक्षक मतदार संघातील उमेदवार कपिल पाटील आणि पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतली आहे.
विधान परिषदेच्या चार जागांसाठी सोमवारी मतदान झालं होतं. याची मतमोजणी नवी मुंबईच्या नेरूळच्या सेक्टर २४ मधील पाम बीच रोडवरील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत चुरस आहे.
कोकण पदवीधर मधील मतदारांची संख्या लक्षात घेत मतमोजणी वेगाने होण्यासाठी २८ टेबल्स मांडण्यात आले. यावेळेस काही सुक्ष्म निरीक्षक देखील मतमोजणीवर लक्ष ठेवून आहेत.
या निवडणुकीचं मतदान मतपत्रिकेवर झाल्यानं मतमोजणीस वेळ लागून निकाल दुपारनंतर हाती येण्याची शक्यता आहे. या मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या विधान परिषदेच्या चार जागांसाठी सोमवारी मतदान झालं होतं. या निवडणुकीचा निकाल आज गुरुवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली होती. त्यामुळे या निकालात कोण बाजी मारणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात ८ हजार ३५३ मतदारांनी मतदान केलं होतं. त्याची टक्केवारी ८२.१३ आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात ३७ हजार २३७ मतदारांनी मतदान केलं होतं. त्याची टक्केवारी ५२.८१ असून कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण ७५ हाजार ४३९ मतदारांनी मतदान केलं. ज्याची टक्केवारी ७२.३५ आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात आमदार कपिल पाटील, भाजपचे अनिल देशमुख, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यात लढत आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपचे अमित मेहता, शेकापचे अॅड. राजेंद्र कोरडे, डॉ. दीपक पवार, जालिंदर सरोदे यांच्यासह १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांच्यात चुरस आहे. निवडणुका तोंडावर असताना निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
हेही वाचा -
'फक्त मराठीच्या मुद्द्यावर सत्तेत येणं कठीण', राज ठाकरेंना नेत्यांनीच सुनावलं