मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेला साद घालून सत्तेत येण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वप्नांचा बुडबुडा त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत फोडला. फक्त आणि फक्त मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणं कठीण आहे, असं सुनावत या नेत्यांनी पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी काहीच का केलं जात नाही? हा जाबही राज यांना विचारला.
बुधवारी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक राज यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी ठेवण्यात आली होती. या बैठकीत राज यांनी मराठीचा मुद्दा जनतेपुढे प्रभावीपणे घेऊन जाण्यास नेते कमी पडत असल्याचं म्हणत रोष व्यक्त केला. एवढंच नव्हे तर, आपल्याच पक्षातील नेत्यांना मराठीचा मुद्दा कितपत पटलाय, याबद्दलही साशंकता व्यक्त केली.
पक्षाचे प्रवक्ते पत्रकार परिषद का घेत नाहीत, नेत्यांचे मीडियाशी चांगले संबंध का नाहीत, भाजपचा सोशल मीडियाचा वर्षाचा खर्च ४०० कोटींचा असताना आपल्याला निधी का मिळत नाही, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत २०१४ ची निवडणूक डोक्यातून काढून टाका. भाजपचा ईव्हीएममुळे विजय झाला असून पुन्हा मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं म्हणत नेत्यांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न केला.
या प्रश्नांची उत्तरं देताना वरिष्ठ नेत्यांनी राज यांनाच फैलावर घेतलं. फक्त मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणं आता कठीण आहे. पक्षाकडे इतरही कार्यक्रम असले पाहिजे, वरिष्ठ नेते पक्ष सोडत असताना त्यांना रोखण्यासाठी काहीच केलं जात नाही, शिवाय विरोधही होत नाही, यावर पक्षात साधी चर्चाही होत नाही, माध्यमांकडून आता मनसेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवणं थांबवलं आहे. राज्यातली शेतकरी सेना, महिला सेना काय काम करते काहीच माहीत नाही, पक्षात नुसता सावळागोंधळ सुरू असून हा प्रकार वेळीच रोखला नाही तर नेतेपदाचा राजीनामा देण्याचा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला.
तर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नाशिकमध्ये चांगलं काम करूनही आपल्याला नगरसेवक सोडून गेले, आपण आपल्या कामांचं मार्केटिंग करण्यात कमी पडलो, म्हणूनच पक्ष कार्यालयात सकारात्मक ऊर्जा उरलेली नाही, त्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलं पाहिजे, महिलांच्या भूमिका मांडायला पक्षात महिला असल्या पाहिजे, असं सांगत कानउघाडणी केली.
या बैठकीत राज यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यासोबतच राज यांचे सुपुत्र अमित यांना पक्षात सक्रीय करण्याचीही जोरदार मागणी करण्यात आली.
हेही वाचा -