मुंबईतील २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांनी मला कुठलेही पुरावे नसताना तुरूंगात डांबलं. तिथं माझा प्रचंड छळ केला. तेव्हा मी करकरे यांना म्हटलं की तुमचा सर्वनाश होईल. माझ्या शापामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.
भोपाळमधील एका सभेत बोलताना साध्वी म्हणाल्या, ''करकरे यांनी मला बाॅम्बस्फोटाच्या खोट्या कटात गोवण्याचा प्रयत्न केला. मला तुरूंगात डांबून प्रचंड त्रास दिला. शिवीगाळ केली. पुरावे नसतानाही मला तुरूंगात का ठेवलं, याबद्दल जेव्हा सुरक्षा आयोगाच्या सदस्याने करकरे यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की, मी काहीही करेन, साध्वीविरोधात पुरावे सादर करेन, मी तिला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही.”
''करकरे हे देशद्रोही, धर्मद्रोही होते. त्यामुळे मी त्यांना शाप दिला की त्यांचा वंशनाश होईल. मी ज्या दिवशी तुरूंगात गेले, तेव्हा त्यांच्या घरी सुतक सुरू झालं होतं. दहशतवाद्यांनी त्यांना मारल्यानंतर ते सुतक दूर झालं,'' असं धक्कादायक वक्तव्य साध्वी यांनी केलं.
आधीच बाॅम्बस्फोटातील आरोपी असल्याने साध्वींच्या उमेदवारीवरून विरोधक भाजपाला लक्ष्य करत आहेत. त्यातच साध्वींच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं असून त्यांनी साध्वींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी उचलून धरली आहे.
हेही वाचा-
देवराच दक्षिण मुंबईचे योग्य प्रतिनिधी, मुकेश अंबानींनी दिला पाठिंबा
बीडीडी चाळीतील रहिवाशांकडून अरविंद सावंत यांचा निषेध