मागच्या मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ प्रकल्पही गोत्यात?

भाजप सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या कुठल्याही पायाभूत प्रकल्पांना स्थगिती देण्यात आलेली नाही. मी केवळ या प्रकल्पांचा फेरआढावा घेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मागील सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचं काम सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाती घेतलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मंत्रालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीला एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, सुभाष देसाई, जयंत पाटील या मंत्र्यांसह राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, एमएमआरसीएच्या प्रमुख अश्विनी भिडे इ. अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा- नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, वर्सोवा-वांद्रे सी लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग इ. प्रकल्पांच्या कामांचा फेरआढावा घेतला. 

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यभर विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. यापैकी कुठल्याही विकासकामाला सरकारने स्थगिती दिलेली नाही. उलट ही कामे जलदगतीने कशी पूर्ण होतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या कामांसाठी जो निधी वापरण्यात आला आहे. त्या निधीचा योग्य वापर होणं तसंच त्याचा जनतेला होणारा प्रत्यक्ष लाभ यानुसार त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणं आवश्यक आहे.

मेट्रोसाठी विविध ठिकाणी कारशेड उभारताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनातही समृद्धी आली पाहिजे तसंच बुलेट ट्रेनबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या