बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला गती द्या, उद्धव ठाकरेंचे निर्देश

वरळी, एन एम जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी वर्षा इथं झालेल्या एका बैठकीत दिले. (maharashtra cm uddhav thackeray orders to complete bdd chawl redevelopment process speedily)

वरळी येथील बीडीडी चाळीत ९६०० भाडेकरू आहेत. या भाडेकरूंची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया तातडीने करण्यासाठी त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करावं आणि विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण करा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याकामी महसूल विभागाकडून आवश्यक तेवढे उपजिल्हाधिकारी किंवा नायब तहसीलदार नियुक्त करण्यात यावेत, असंही त्यांनी सांगितलं.

ना. म. जोशी मार्ग इथं ३२ चाळी असून त्यात २५०० भाडेकरू राहतात. तर नायगाव इथं ४२ चाळी असून त्यात ३३०० भाडेकरू आहेत. तेथील पुनर्विकास प्रक्रियेतील समस्या तातडीने दूर करून विकासकामास सुरुवात करावी तसंच भाडेकरूंचे योग्य स्थलांतर करावं, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

हेही वाचा- वरळीच्या बीडीडी चाळीत वाढतोय कोरोनाचा धोका

यासंदर्भात गृहनिर्माण प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास यांनी प्रारंभी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत वस्तुस्थिती सांगितली तसंच या प्रकल्पांची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे हा पुनर्विकास रखडला असून त्याबाबतही येणाऱ्या अडचणींचा उहापोह त्यांनी केला. सर्वसामान्यांना घरे मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी या सर्व अडचणी दूर करून कालबद्ध रीतीने पुनर्विकास मार्गी लावावा व याबाबत दर काही दिवसांनी आढावा घेत राहावा अशीही सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , टाटा हाऊसिंग, एल एन्ड टी कंपनी यांचे अधिकारी देखील उपस्थित होते.

हेही वाचा- 'या' बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर

पुढील बातमी
इतर बातम्या