जितेंद्र आव्हाड म्हणतात... “खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”!

राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. सोबतच समाजातील काही घटकांसाठी पॅकेजची घोषणाही केली आहे. यावरून सध्या विरोधी पक्ष भाजपकडून मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने बेड्स, व्हेंटिलटर्स, आॅक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडाही जाणवू लागला आहे. केंद्राकडून मर्यादीत प्रमाण लशींचा पुरवठा होत असल्याने लसीकरण मोहीमेची गतीही मंदावली आहे. या सर्व परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी संचारबंदी लागू केली असता, सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढं ढकलण्यात आल्याने त्यांच्या भवितव्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे, ही सर्व परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरेंना अपयश आल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

त्यावर चक्क कविता करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आहे. 'खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे', असं शीर्षक असलेली कविता त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. उपरोधित शैलीत लिहिलेली ही कविता आहे.

जितेंद्र आव्हाड यांची कविता

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..

कधी थाळ्या वाजवायला लावल्या नाही

ना कधी मेणबत्या आणि दिवे लावायला लावले

निर्णय घेताना घेतले विश्वासात

विरोधकांचे त्यामुळेच फावले

शांत राहून तो लढत आहे

विरोधकांचे खरंच राईट आहे

खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!

मंदिर उघडा, बाजार उघडा

शाळा उघडा ते म्हणाले

परीक्षा पुढे ढकलल्या तर

ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले

करोना वाढला तर ते आता

फक्त सरकारला दोषी ठरवत आहे

विरोधकांचे खरंच राईट आहे

खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!

इमान तर विकले नाहीच

ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या

कोरोनाचे आकडे लपवले नाहीच

खोट्याने न कधी माना झुकल्या

घरी पत्नी आणि मुलगा

आजारी असतांना तो मात्र लढत आहे

विरोधकांचे खरंच राईट आहे....

खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!

ना कुठे बडबोले पणा

ना कशाचा बडेजाव

आठ हजार कोटीचे विमान नको

ना कोणत्या प्रकरणात घुमजाव

जे करतोय ते प्रामाणिक पणे तो करतो आहे.....

विरोधकांचे खरंच राईट आहे

खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!

व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय, विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय....

गोर गरीब जनतेला एकवेळ शिवभोजन मोफत देतोय....

निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट,शेतकऱ्यांच्या अडचणी

साठी तो शांततेत लढतो आहे

विरोधकांचे खरंच राईट आहे

खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.....!!

ना क्लीन चिट देता आली

ना खोटी आकडे वारी देता आली

निवडणूक काळात तर कधी

ना अशक्य घोषणा त्याला करता आली

जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय

विरोधकांचे खरंच राईट आहे....

खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊन

निधी पंतप्रधान निधीला ते देताय

उठ सूठ, सकाळ संध्याकाळ

ते टीका सरकार वर करताय

तो मात्र टिकेला उत्तर न देता

सर्वसामान्यांसाठी झटत आहे

विरोधकांचे खरंच राईट आहे....

खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!

- डॉ. जितेंद्र आव्हाड

(maharashtra housing minister jitendra awhad taunts bjp through poem)


हेही वाचा- 

बाळासाहेबांनी पेटवलेली हिंदुत्वाची मशाल विझली, प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

१५०० रुपयांत रिक्षाचालक कुटुंबाचं पोट भरणार कसं? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल


पुढील बातमी
इतर बातम्या