Advertisement

१५०० रुपयांत रिक्षाचालक कुटुंबाचं पोट भरणार कसं? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेल्या आर्थिक मदतीत हातावर असलेली लोकं आपल्या कुटुंबाचं पोट कसं भरणार? असा प्रश्न भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

१५०० रुपयांत रिक्षाचालक कुटुंबाचं पोट भरणार कसं? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
SHARES

महाराष्ट्रात संचारबंदी लागू करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजातील विविध घटकांसाठी पॅकेजची घोषणा केली आहे. परंतु हे पॅकेज अत्यंत तुटपुंज असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेल्या आर्थिक मदतीत हातावर असलेली लोकं कुटुंबाचं पोट कसं भरणार? असा प्रश्न भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या निर्णयांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने फैलावत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात ५९ हजार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. हे पाप राज्य सरकारचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आहे. देशात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ४१ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांकडेच उत्तर नसल्याने ते सारखी लाॅकडाऊन लावण्याची धमकी देत होते. जसं काय संपूर्ण महाराष्ट्रच त्यांनी विकत घेतलाय. अखेर त्यांनी लॉकडाऊन लागू केला केलाच.

हेही वाचा- “मुंबईचे डबेवाले, सलून, टॅक्सी चालकांनाही पॅकेज द्या”

मुख्यमंत्री मातोश्रीत बसून नेमकं करतात काय? माणूस मुंबईत हवं ते करू शकतो. पण रुग्णांना बेड मिळत नसताना मुख्यमंत्री मुंबईत ताबडतोब हॉस्पिटल उभं करू शकत नाही? फक्त मृतांची संख्या, बाधितांची संख्या जाहीर करायची. हे कमी-ते कमी असं मुख्यमंत्री जाहीर करतात. जनाची नाही, मनाची तरी आहे का? कमी असेल तर ते उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री असतो. नुसतं खुर्चीवर बसून चालत नाही. त्याला कर्तृत्व लागतं. मुख्यमंत्री मास्क लावा, हे करा, ते करा असं सांगतात का? असा प्रश्न नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला

पॅकेज म्हणून महिन्याला दीड हजार देतो असं हे सांगतात. एखाद्या क्लार्क किंवा अधिकाऱ्याला सांगा हे जाहीर करायला. रिक्षावाल्यांना १५०० रुपये देण्याची घोषणा केलीय. रिक्षावाला ५ माणसांचं कुटुंब १५०० रुपयांमध्ये चालवू शकणार आहे का? नुसत्या मुंबईत सव्वा लाख भिकारी आहेत. रस्त्यावर लोकंच नसतील तर त्यांना भीक तरी कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे हात पसरत आहेत. उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी ते केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचं काम घटनेनं राज्य सरकारला दिलं आहे. जरा राज्यघटना वाचा. नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय? राज्य आर्थिक संकटात टाकायचं काम सुरू आहे, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

(bjp mp narayan rane slams cm uddhav thackeray on relief package for small workers during lockdown)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा