महाराष्ट्रातील कोरोनाची (coronavirus) साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांसाठी सरकारकडून पॅकेज देखील जाहीर करण्यात आलं आहे. मात्र या लाभार्थ्यांमध्ये शेतकरी, सलून चालक, फूल विक्रेते, मुंबईचे डबेवाले, टॅक्सी चालक आणि इतर छोट्या व्यावसायिकांनाचा समावेश नाही. त्यामुळे अशा घटकांनाही आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी पत्रात म्हटलं आहे की, संचारबंदीच्या काळात भाजीपाला, फळ बागायती, फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. कारण या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठ्या प्रमाणात होत नाही. परिणामी शेतकऱ्यांचं यामध्ये आर्थिक नुकसान होणार आहे. तसंच सलूनचं दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचंही मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. या कालावधीत सर्व धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फूल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे.
हेही वाचा- गरीबांना मोफत अन्नधान्य, फेरीवाले, रिक्षाचालकांना अर्थसहाय्य.., मुख्यमंत्र्यांनी केलं ‘पॅकेज’ जाहीर
शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या! प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 15, 2021
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र. pic.twitter.com/kNs3SDoiho
याचप्रमाणे टॅक्सी चालक, मासळी विक्रेते उपरोक्त सर्व घटक प्रभावित होणार असल्याने त्यांच्यासाठी पॅकेजमध्ये तरतूद करणं गरजेचं आहे. तेव्हा वरील घटकांसाठी या पॅकेजमध्ये तरतूद करावी, यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची तरतूद करावी आणि उपरोक्त घटकांना न्याय द्यावा, अशी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
संचारबंदीची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज देखील जाहीर केलं आहे. या पॅकेजअंतर्गत अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना मोफत गहू-तांदूळ, वृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांगांना आगाऊ रकमेचा लाभ, बांधकाम मजूर, घरेलू कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, आदिवासींना आर्थिक मदत मिळणार आहे.
मात्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक असून यामध्ये शेतकरी आणि बारा बलुतेदार घटकांचा समावेश नाही. त्यामुळे या घटकांना देखील पॅकेजचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी भाजपकडून (bjp) करण्यात आली आहे.
(maharashtra congress president nana patole demands relief package for mumbai dabbawala taxi driver and farmers)
हेही वाचा- मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे!, फडणवीसांचा ठाकरे सरकारला टाेला