काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी हाती भाजपाचा झेंडा घेत काँग्रेसला जोरदार धक्का दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळं आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
सुजय विखे हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. त्यानंतर सुजय यांचा भाजपामधील प्रवेश नक्की मानला जात होता. तर त्यांच्या भाजपामधील प्रवेशाला विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी विरोध केला होता. त्यामुळे आता गांधी काय निर्णय घेतील हे पहावं लागणार आहे. मात्र आपण भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असून सुजय यांचं भाजपात स्वागत आहे अशी, प्रतिक्रिया देताना पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचंही ते म्हणाले.
अहमदनगरमध्ये भाजपाचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास सुजय यांनी व्यक्त केला. तसंच अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानत, त्यांनी अहमदनगरमध्ये भाजपाला वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं. तसंच आई-वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागल्याची खंत असल्याचंही ते म्हणाले.
सुजय यांच्या भाजपातील प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं नाव संसदीय बोर्डाकडे पाठवणार असल्याची माहिती दिली. तसंच संसदीय बोर्ड त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल आणि सुजय यांनी घेतलेला निर्णय योग्यच ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेत
आदित्य ठाकरेंकडून निवडणूक लढवण्याच्या वृत्ताचं खंडन