राज्य सरकारने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने विकेंड लाॅकडाऊनसहीत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याअंतर्गत स्थानिक प्रशासनाकडून दुकाने, छोटे उद्योग-व्यवसाय बंद करण्याची सक्ती केली जात असल्याने दुकानदार, व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे. याच मुद्द्यावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी राज्य सरकारला टोला हाणला आहे.
खंडणी वसूल करणाऱ्या सरकारला मेहनत करून पैसे कमावणाऱ्या व्यावसायिक व दुकानदारांचे हाल कसे कळणार? कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीचे सर्व नियम पाळून, व्यवसाय करण्याची परवानगी सगळ्यांना द्यावी. अन्यथा व्यापारी वर्गाच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावं, असं ट्विट नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.
हेही वाचा- आधी नोटाबंदीत, आता लशीसाठी लोकांना रांगेत उभं केलं- संजय राऊत
राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहितेंर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. परंतु या निर्बंधांमुळे छोट्या व्यावसायिकांचा धंदाच ठप्प झाल्याने ते संतप्त झाले आहेत. या जाचक निर्बंधांविरोधात ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला आहे.
त्याचा संदर्भ घेत महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेमार्फत राज्य सरकारला एक निवेदन देखील पाठवण्यात आलं आहे. या निवेदनात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्रात (maharashtra) अंदाजे १५ लाख व्यापारी आहेत. यासोबत त्यांचे कामगार आणि त्यांचं कुटुंब जोडलेलं आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे छोटे व्यापारी, दुकानदार यांचं मोठं नुकसान झालं.
तरीही कामगारांचे पगार, विजेचं बिल, सरकारी कर भरत आर्थिक झळ सोसूनही का व्यापारी पुन्हा उभा राहिला. स्थिर स्थावर होण्यास त्याला चार ते पाच महिने लागले. त्यातच पुन्हा लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे त्यांचं कंबरडं पुरतं मोडून जाईल, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या मागणीनुसार या छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून किमान २ ते ३ दिवस व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मनसे व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
हेही वाचा- दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर