Advertisement

आधी नोटाबंदीत, आता लशीसाठी लोकांना रांगेत उभं केलं- संजय राऊत

महाराष्ट्रावर टीका करणाऱ्यांनी आपलं रक्त मराठी माणसाचं आहे की नाही हे तपासावं. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु संकटाच्या काळातही राजकारण करणं योग्य नाही.

आधी नोटाबंदीत, आता लशीसाठी लोकांना रांगेत उभं केलं- संजय राऊत
SHARES

दिल्लीतील सत्तेत बसलेले आपलेच मराठी मंत्री महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रावर टीका करणाऱ्यांनी आपलं रक्त मराठी माणसाचं आहे की नाही हे तपासावं. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु संकटाच्या काळातही राजकारण करणं योग्य नाही, अशा शब्दांत लस पुरवठ्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर संजय राऊत यांनी टीका केली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत (sanjay raut) यांनी दिल्लीतील नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, एक काळ असा होता महाराष्ट्राचा विषय असला की पक्ष कुठलाही असो दिल्लीतील सगळे मराठी मंत्री, नेते एकत्र यायचे आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी आवाज उठवायचे. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आताचं चित्र नेमकं उलटं आहे. आता सत्तेत सामील आपले मराठी मंत्री महाराष्ट्राची बदनामी करताना दिसतात. हे चित्र अत्यंत वेदनादायी आहे.  

अमानूष राजकारण

एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणातात, लस उत्सव साजरा करा. तर दुसरीकडे महाराष्ट्राला आवश्यक तेवढा लस पुरवठा होत नाही. कारण का तर इथे भाजपचं राज्य नसून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. याला अमानुष राजकारण म्हणतात. उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त लसीचा पुरवठा झाला. गुजरातमध्ये तर कोरोनाची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, तिथं महाराष्ट्र मॉडेल राबवण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत. महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या असूनही त्यांना १ कोटी लशी देण्यात आल्या आहेत आणि महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींची आवश्यकता असताना ८ लाख लशींचाही पुरवठा होत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा- मुंबईतील 'हे' ७ विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट

महाराष्ट्रातील जनता मोदींची नाही का?

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश सध्या संकटात आहे. कोरोनाविरोधातील लढाई आमची व्यक्तीगत लढाई नाही. आम्ही केंद्राच्या नेतृत्वात ही लढाई लढत आहोत. नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधान आहे, असं आम्ही म्हणतो, त्यांचा आदर करतो, आम्ही त्यांचे शब्द मान्य करतो. तर महाराष्ट्रातील जनता ही मोदींची जनता नाही का? असा प्रश्न विचारतानाच विरोधी पक्षाच्या आमच्या सहकाऱ्यांनी थोडं संयामाने वागायला हवं. लस पुरवठ्याच्या मुद्द्यावर थेट अंगावर येऊन बोलू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

भाजपचे नेते कालपर्यंत इथले राज्यकर्ते होते. महाराष्ट्रातील जनतेने भाजपचे १०५ आमदार निवडून दिले आहेत. याचं भान त्यांनी ठेवायला हवं. किमान त्यांच्यासाठी तरी त्यांनी केंद्राकडून लस घेऊन यायला हवी. महाराष्ट्र जेवढा आमचा आहे, तेवढा तुमचाही आहे. महाराष्ट्र म्हणजे कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. आम्हाला यामध्ये राजकारण आणायचं नाही, तुम्ही आणू नका.  

मुंबईत ५१ लसीकरण केंद्र लशींअभावी बंद पडली आहेत. अनेक ठिकाणी एक-दोन दिवस पुरेल एवढा लशींचा साठा आहे. लस घेण्यासाठी लोकं रांगेत तिष्ठत उभे असल्याचं भयंकर चित्र दिसत आहेत. आधी तुम्ही नोटाबंदीसाठी लोकांना रांगेत मारलं. आता लसीसाठी रांगेत मारता आहात. हा काय प्रकार सुरू आहे? याचा अर्थ केंद्र सरकारचं नियोजन चुकलं आहे. त्यासाठी तुम्ही राज्याला दोष देऊ नका, अशा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांना सुनावलं.

(shiv sena mp sanjay raut slams bjp over covid 19 vaccine supply)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा