सोशल मीडियातील प्रचारयुद्धाला मनसे पदाधिकारी 'सज्ज'

एका बाजूला जनमाणसांवर प्रभाव टाकणारी काही वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या सरकारच्या हातचं बाहुलं बनलेली असताना समाजातील वास्तव प्रकाशझोतात आणण्याचं काम काही समाजधुरीण सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत परिणामकारकरितीने करत आहेत. त्यातच येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचं वर्चस्व राहणार असल्याने या प्रचारयुद्धात मनसे पदाधिकाऱ्यांना सज्ज ठेवण्याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी शनिवारी विशेष शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात मनसे पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाचं अस्त्र प्रभावीपणे वापरण्याचं तंत्र शिकवण्यात आलं.

उत्स्फूर्त प्रतिसाद

मनसे नेते आणि प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार ३ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात 'राजकीय कार्यकर्ता आणि माध्यमं' या विषयावरील 'सज्जता २०१९' मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला पश्चिम उपनगरातील मनसेचे सर्व पुरूष उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष इ. दीड हजार ते अठराशे पदाधिकारी उपस्थित होते.

दुधारी तलवारीचा वापर

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा माध्यमांतून सोशल मीडियाचं जाळं खेडोपाडी पसरलं आहे. एक वेळ अशी होती की वृत्तपत्रे की वृत्तवाहिन्याच लोकांशी संवाद साधत. पण ती जागा आता सोशल मीडियाने घेतली आहे. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. तिचा चांगल्या कारणासाठी वापर केला, तर समाजात त्याचे चांगले प्रतिबिंब उमटतात आणि चुकीच्या गोष्टींसाठी वापर केल्यास समाजस्वाथ्य बिघडल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्या अनुषंगाने सोशल मीडिया अभ्यासक केतन जोशी यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियातील बारकावे आणि सोशल मीडिया वापरण्यामागचा उद्देश यावर मार्गदर्शन केलं.

 

तर, ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी भाजपाने सोशल मीडियाचा चाणाक्षपणे वापर करून काँग्रेसविरोधी वातावरण पेटवून निवडणुका कशा जिंकल्या आणि आता निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्याने भाजपाला याच सोशल मीडियावरून टीकेचा सामना कसा करावा लागत आहे, हे उलगडून सांगितलं. विकास आणि भावनिक मुद्द्यांचा वापर भाजपा स्वत:च्या फायद्यासाठी कशा रितीने करून घेत आहे, याचे दाखले देताना त्यांनी भाजपा सरकारच्या खोटारडेपणाची चिरफाड केली.   

नेमक्या शब्दांत, प्रभावीपणे

सोशल मीडियाचा नेमक्या शब्दांत आणि प्रभावीपणे वापर कसा करावा याचं अत्यंत उत्तम उदाहरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे करून देत आहेत. तर गेल्या साडेचार वर्षांत सत्ताधाऱ्यांनी केवळ जुमलेबाजी करून सोशल मीडियाला हाताशी धरून सत्तेचा गैरवापर कसा केला, हे देखील अधोरेखीत करायचं होतं. म्हणूनच मनसे पदाधिकाऱ्यांना राजकारण आणि समाजकारणासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर करता यावा यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

-अविनाश अभ्यंकर, नेते, मनसे


हेही वाचा-

तर, राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करू- आरएसएस

शिवसेना म्हणजे दुतोंडी साप; प्रकाश आंबेडकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल


पुढील बातमी
इतर बातम्या