शिवसेना बोलते एक नि करते एक असं म्हणत भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेचा उल्लेख दुतोंडी साप असा केला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चलो आयोध्या मिशनवरही हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर बांधण्यासाठी मुंबईतूनच विटाही घेऊन जाव्यात, असाही टोला आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
निवडणुका जवळ आल्यानंच शिवसेनेला राम आठवल्याचं म्हणत विरोधकांनी यावरून शिवसेनेला घेरण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच बापाचं स्मारक पाच वर्षात बांधू शकत नाहीत ते राम मंदिर काय बांधणार, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर सामनामधून अजित पवारांना तिखट शब्दात प्रतित्युत्तर दिलं होतं. तर काँग्रेसनंही राम मंदिराच्या मुद्दयावरून उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी टोला लगावला आहे.
आता आंबेडकरांनीही उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिराच्या मुद्यावर टीका केली आहे. शिवसेना ही दुतोंडी सापासारखी आहे. शिवसेना बोलते एक नि करते एक. पण लोक आता मुर्ख राहिली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. निवडणुका जवळ येत असून युती आणि आघाडीच्या चर्चा रंगल्या आहेत. असं असताना आंबेडकरांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -
राम मंदिरासाठी भाजपाला सत्तेतून खाली खेचा, उद्धव यांचा 'आरएसएस'ला सल्ला