ज्या राम मंदिराचा मुद्दा पुढं करून भाजपा सरकार सत्तेत आलं तो मुद्दाच मागच्या ४ वर्षांपासून धूळ खात पडला होता. केवळ शिवसेनेमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्तेत बसवलेल्या भाजपालाही जर राम मंदिर बनवता येत नसेल आणि त्यासाठी दस्तुरखुद्द संघावरही आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर संघ हे भाजपा सरकार खाली का खेचत नाही, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरएसएसला केला आहे.
शुक्रवारी सकाळी शिवसेना आमदार, संपर्क नेते, जिल्हा पदाधिकारी यांची शिवसेना भवनात बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपा आणि आरएसएसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेहनतीमुळेच केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्याचं म्हटलं जात. सत्तेत येताना राम मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा हे मुद्दे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु सत्तेत आल्यानंतर हे सर्व मुद्दे बाजूला पडले आहेत.
परंतु शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करतात सगळ्यांची धडपड सुरु झाली. राम मंदिर उभारण्यासाठी बहुमत असलेल्या पक्षाचं सरकार सत्तेत असतानाही आरएसएसला आंदोलनाची गरज वाटत असेल, तर तुम्ही हे सरकारला खाली का खेचत नाही, असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला.
हेही वाचा-
तर, राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करू- आरएसएस
तर, राम मंदिर उभारण्यासाठी १ हजार वर्षे लागतील- संजय राऊत