आपण जर न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघत बसलो, तर पुढची १ हजार वर्षे उलटली, तरी राम मंदिर उभं राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केलं.
निवडणुका जवळ आलेल्या असतानाच राम मंदिरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा देशातील वातावरण तापायला लागलं आहे. ज्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून भाजपाने लोकसभा निवडणुकीत बाजी मारली, तोच मुद्दा आता भाजपासाठी चिंतेचा ठरू लागला आहे.
All preparations have been done for Uddhav Thackeray's visit to Ayodhya on November 25. He is going there to remind Modi ji & the BJP govt that Ram Temple needs to be constructed. It will take 1000 years if we wait for court's verdict on #RamTemple: Sanjay Raut, Shiv Sena pic.twitter.com/G7mbkVwYRy
— ANI (@ANI) November 1, 2018
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्यतील रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी पुढील वर्षी जानेवारी महिन्यापर्यंत स्थगित केल्याने हिंदुत्ववादी संघटनांमधून न्यायालयाच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एवढंच नव्हे, तर राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणीही या संघटना करू लागल्या आहेत.
'आरएसएस' प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूरच्या आरएसएस मुख्यालयातील दसरा कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारने कायदा करून अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करावा, असं आवाहन केलं होतं. त्यापाठोपाठ शिवसेनेने देखील राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा किंवा अध्यादेश काढण्याची मागणी केली होती.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याची घोषणाही केली. याच विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी सरकारला राम मंदिराच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ते हा दौरा काढत आहेत.
हेही वाचा-
तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत
बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणून उद्धव आहेत, अजित पवारांचा पलटवार