राजकारणामध्ये स्वतःची डाळ शिजत नाही. त्याचा राग ते गरीब फेरीवाल्यांवर काढत आहेत. पण अशा फालतू लोकांना घाबरण्याची काहीही गरज नाही. काँग्रेस पक्ष सदैव तुमच्या पाठीशी आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगत मनसेवर निशाणा साधला आहे. जर मनसेच्या गुंडावर पोलिसांनी कारवाई न केल्यास फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी त्या गुंडाचा सामना काँग्रेस घेईल असा इशाराही निरुपम यांनी दिला आहे.
मुंबई, ठाणे आणि डोंबिवली मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फेरीवाल्यांना मारहाण करून दादागिरी करून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीसही कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईतील कांदिवली पूर्व येथील आकुर्ली रोडवरील फेरीवाल्यांची भेट घेतली. यावेळी संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांना पाठिंबा देत काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी समर्थपणे उभा असल्याची ग्वाही दिली. आझाद हॉकर्स युनियनचे जय सिंह आणि अनिस फातिमा शेख, काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोण अधिकृत आणि कोण अनधिकृत फेरीवाले हे ठरवण्याचा अधिकार राज ठाकरे आणि त्यांच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही. राजकारणामध्ये स्वतःची डाळ शिजत नाही. त्याचा राग ते गरीब फेरीवाल्यांवर काढत आहेत. काही ठिकाणी पोलीस सुद्धा मारून फेरीवाल्यांना जबरदस्तीने हुसकावून लावते, अशी सुद्धा तक्रार फेरीवाले करत आहेत. माझे मुंबईतील सर्व फेरीवाल्यांना सांगणे आहे की, अशा फालतू लोकांना घाबरण्याची काहीही गरज नाही, असे आश्वासन त्यांनी फेरीवाल्यांना दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे फेरीवाल्यांना धमकी देतात. त्यांचे फालतू कार्यकर्ते गरीब फेरीवाल्यांना मारहाण करून त्यांना हुसकावून लावतात. हे भ्याडपणाचे लक्षण आहे. पोलीसही त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करत नाहीत. नुसते अटक केल्याचे नाटक करतात. फेरीवाला कायदा आपल्या देशात आहे. तो लागु करण्यात सरकार अपयशी ठरते हा सरकारचा दोष असल्याचे निरुपम यांनी सांगितले.
जर मनसेचे फालतू गुंड निरपराध फेरीवाल्यांना त्रास देत असतील, त्यांच्यावर जुलूम करत असतील तर त्यांना संरक्षण देणे हे पोलिसांचे काम आहे. जर मनसेचे गुंड फेरीवाल्यांना असाच त्रास देत राहिले आणि पोलिसांनी मनसेच्या फालतू गुंडांवर त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर सर्व फेरीवाले कायदा हातात घेण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत, असाही इशारा निरुपम यांनी दिला. काँग्रेस पक्ष त्यांच्या बरोबर उतरून आंदोलन करेल आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास याला सरकार आणि महापालिका जबाबदार असेल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -
खरं कोण खोटं कोण? 'त्या' नगरसेवकांवर मनसे, शिवसेना दोघांचाही दावा
दादरमध्ये मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात