महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून हाती शिवबंधन बांधलेल्या ६ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक पुन्हा मनसेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा बुधवारी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने 'हे' नगरसेवक आमच्याकडेच असल्याचा दावा केल्याने दोन्ही पक्षांकडून अजून या नगरसेवकांची खेचाखेची सुरूच असल्याचं दिसत आहे.
फुटून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवकांनी पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा मनसेने केला आहे. या नगरसेवकांशी संपर्क झाला असून, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, या नगरसेवकांनीराज ठाकरे यांच्याशी बोलणंकेल्याचंही मनसेकडून सांगण्यात येत आहे.
परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव यांनी संपर्क साधत मनसे मध्ये पुन्हा येणार असल्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा मनसेने केला आहे. हे नगरसेवक लवकरच कळवणार असल्याची माहिती मनसेकडून मिळत आहे.
शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक पुन्हा मनसेत येणार ही बातमी प्रसारित झाल्यानंतर शिवसेनेच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेत आलेले ६ नगरसेवक शिवसेनेसोबतच असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या गोटातूनयेत आहे. त्यामुळे नेमकं कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं असा संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा -
नगरसेवक वाद: मनसेनंतर शिवसेनेनेही मागितली सुनावणी