राणेंची सहनशीलता संपली..?

राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याने महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या मंत्रीपदालाही हुलकावणी मिळत आहे. मंत्रीपदासाठी ४ महिने वाट पाहून थकल्यानंतर आता माझी सहनशीलता संपण्याआधीच निर्णय घ्या, असं म्हणत भाजपा नेतृत्वाला धमकीवजा इशारा दिला आहे.

संयमाचा कडेलोट

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपप्रणित एनडीएध्ये दाखल झालेल्या नारायण राणे यांच्या पदरी निराशाच आली. जवळपास ४ महिने झाले तरी राणे यांना आश्वासन देऊनही मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचा संयम आता तुटत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. याची प्रचिती राणे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आली. शिवसेनेवर टिकास्त्र सोडल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी हा सूचकवजा इशारा दिला.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेत विरलं

नारायण राणे यांना भाजप कोट्यातून मंत्री करणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा सांगितलं. त्यानंतर राणे यांनी मंत्रीपदाचा मुहूर्त स्वत:च जाहीर केला होता. मात्र जाहीर केलेल्या मुहूर्तावर राणे यांचा शपथविधी झालाच नाही. शिवाय विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीतही राणे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे राणे अधिकच अस्वस्थ झाले. तरीही राणे यांना संयमाने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर अनेकदा मुख्यमंत्री आणि राणे यांच्या बैठकाही झाल्या. मात्र अजूनही त्याचं फळ त्यांना मिळालेलं नाही.


हेही वाचा-

नारायण राणे यांची नवी इनिंग, 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'ची घोषणा

राणे सोडून शिवसेनेचा कुणालाही पाठिंबा?


पुढील बातमी
इतर बातम्या