घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून सध्या भाजपाचे आमदार राम कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलंच शाब्दीक युद्ध रंगलं आहे. आ. कदम यांनी मुलींना लग्नासाठी पळवून आणण्याचं आक्षेपार्ह विधान केल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आ. कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तर कदम यांना थेट रावणाची उपाधीच देऊन टाकली. कदम यांनी मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यासं केल्याचं म्हटलं आहे.
घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात उपस्थितांना उद्देशून कुठल्याही कामासाठी तुम्ही मला भेटू शकता, असं कदम यांनी सांगितल्यावर गर्दीतील एकाने त्यांना म्हटलं की मी मुलीला प्रपोज करूनही ती लग्नाला नाही म्हणते. त्याला प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, ''मी तुम्हाला शंभर टक्के मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन या. ते म्हणाले की मुलगी पसंत आहे, तेव्हा तिला पळवून आणणार अाणि तुम्हाला देणार.''
कदम यांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने कदम यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. राम कदम यांच्या रुपाने 'रावणी' चेहरा समोर आल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. घाटकोपरमधील दहीहंडीच्या कार्यक्रमात कदम मुलींना पळवून आणण्याची भाषा बोलतात. हा कृती रावणाच्या बरोबरीची असल्याने राम कदम यांना पुढे रावण कदम म्हणून ओळखलं जाईल, असंही मलिक म्हणाले.
तर, राज्यात महिलांची स्थिती चांगली नसताना, महिला असुरक्षित असताना एका लोकप्रतिनिधीने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिली.
हेही वाचा-
शिवसेनेच्या हाजी अराफत शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबईकर म्हणून आपलं कर्तव्य आहे की नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल