मुसळधार पाऊस पडला की भौगोलिक रचनेमुळे अनेकदा मुंबई तुंबते. मग विचारलं जातं की मुंबई महापालिका काय करतेय? पण मुंबईकर म्हणून आपलीही कर्तव्ये-जबाबदाऱ्या आहेत की नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना केला.
'ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इंटिस्ट्यूट' या संस्थेच्यावतीनं अंधेरीत शुक्रवारी वार्षिक दीक्षांत सोहळा झाला. या कार्यक्रमात उद्धव यांनी हा प्रश्न विचारला.
यावेळी संस्थेच्या विविध अभ्यासक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभात गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी महापालिका आयुक्त जयराज फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.
ही संस्था नागरिकांना त्यांची शहराप्रती कर्तव्य, संस्कार शिकवते, असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले. पण अजूनही कचरा कुठे टाकायचा? हे आपल्याला शिकवावं लागतं याबद्दल खतं व्यक्त केली. आपल्यावर संस्कार होणं गरजेचं असून ते काम ही संस्था करते असते. याकरता प्रत्येक राज्यात या संस्थेच्या शाखा उघडल्या गेल्या पाहिजेत, अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याप्रसंगी बोलताना शिक्षणाबरोबरच प्रशिक्षणही गरजेचं असतं असं सांगत प्रशिक्षित झाल्यानंतर नैतिकतेचं शिकवणही आवश्यक असल्याचं सांगितलं. पैसे येतील जातील, पदे मिळतील जातील. परंतु नैतिकता असेल तरच सुसंस्कारी माणूस बनता येईल, असंही ते म्हणाले.
हेही वाचा-
ईव्हीएमच्यानिमित्तानं पुन्हा भाऊबंदकी? राजचं उद्धवला पत्र
शिवसेना लोकसभेच्या ४८ जागा लढणार स्वबळावर!