मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, धनंजय मुंडेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा क्रांती मोर्चाकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईसह महाराष्ट्र बंद करण्यात आला होता. या बंद दरम्यान मुंबईसह राज्यभर जाळपोळ आणि दगडफेडीच्या घटना घडल्या. त्यानुसार पोलिसांनी आंदोलकांविरोधात दगडफेक, जाळपोळ आणि खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे केवळ सुडबुद्धीनं केल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

१५५ हून अधिक गुन्हे

बंदच्या दरम्यान झालेल्या जाळपोळ-दगडफेकीविरोधात पोलिसांनी राज्यभरात १५५ हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. तर अनेकांना ताब्यातही घेतलं आहे. पोलिसांच्या-या कारवाईमुळं मराठा समाजात सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. त्यामुळं आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी होत आहे. मराठा समाजातील संताप लक्षात घेत हे गुन्हे मागे घ्यावेत. राज्यातील सर्व जिल्हा पोलिस प्रमुखांना यासंबंधीचे निर्देश जारी करत कारवाई थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मुंडे यांनी केली.

वक्तव्याने आंदोलन चिघळलं

५८ मोर्चे शांततेत निघाले, मोर्चेकरांनी शांतता, संयम आणि शिस्तीचा आदर्श निर्माण करून दिला. असं असताना हे आंदोलन चिघळल ते सरकारनं दुर्लक्ष केल्यानं. त्यातही मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर शासकीय पुजेबाबत बेजबाबदार वक्तव्य करत आगीत तेल ओतण्याचंच काम केल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. ८ दिवस आंदोलन धुमसत असताना सरकार मात्र शांत होतं, अशी टीकाही त्यांनी केली.

आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्याविरोधात कारवाई केली तर मराठा समाजातील तरूणांचं आयुष्य उद्धवस्त होईल. मुळात सरकार मराठा तरूणांचं आयुष्य घडवण्यास असमर्थ आहे, त्या सरकारला निरपराध तरूणांवर खोटे आरोप करून त्यांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार दिला कुणी? असा सवालही त्यांनी केला.


हेही वाचा-

राज्यभरात 5 दिवसांत 155 हून अधिक गुन्हे दाखल

मुंबई बंद: ४४७ आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात


पुढील बातमी
इतर बातम्या