चेंबूर बलात्कार प्रकरण: राष्ट्रवादीची एसआयटी चौकशीची मागणी

मुंबईतील चेंबूरमध्ये सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरूणीच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर राष्ट्रवादीतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान सुळे यांनी पोलीस, गृहखाते आणि राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर खरपूस टीका केली.   

काय म्हणाल्या सुप्रिया? 

या घटनेला महिना उलटून देखील अजून आरोपींना अटक झालेली नाही. उलट पीडित तरुणीच्या कुटुंबीयांवर पोलिसांकडून दवाब टाकण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.  पीडितांना न्याय द्यायला जमत नसेल तर गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होण्यासाठी हा तपास एसआयटीकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत गुंग आहेत. त्यांनी काल जालन्यात असूनही या बलात्कार पीडितेविषयी एक शब्दही काढला नाही. यावरून हे सरकार किती असंवेदनशील आहे, हे दिसून येतं. 

दरम्यान जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पीडित कुटुंबाने घेतली आहे. 


हेही वाचा-

अन् शरद पवार भडकले, पत्रकार परिषद सोडून चालू लागले

भाजपात मेगाभरती पार्ट २, कोण कोण जाणार?


पुढील बातमी
इतर बातम्या