अमित शहा म्हणजे जनरल डायर, नवाब मलिक यांची टीका

सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात राजधानी दिल्लीसह ईशान्येकडील राज्यांत हिंसाचार उफाळून आला आहे. सर्वत्र जाळपोळ सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे विद्यार्थी देखील या कायद्याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. या हिंसक आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापर करत असल्याने विरोधकांकडून पोलिसांच्या कारवाईवर टीका करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. अमित शहा जनरल डायरपेक्षा कमी नाहीत, असं मलिक म्हणाले आहेत.

हेही वाचा- छीन के लेंगे आझादी… मान्य आहे का? फडणवीसांनी विचारला मुख्यमंत्र्यांना प्रश्न

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी तेथील पोलिसांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घुसखोरी केली तसंच कॅम्पस परिसरात गोळीबार देखील केला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या घटनेची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियानवालाबागशी केली होती. देशात जाणीपूर्वक अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. जालियानवालाबाग हत्याकांड झालं, त्यावेळी जसा हिंसाचार झाला, तसंच वातावरण देशात निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं ठाकरे म्हणाले होते. त्याला नवाब मलिक यांनीही समर्थन दिलं आहे. 

हेही वाचा- युवाशक्तीचा बाॅम्ब पेटवू नका, ‘जामिया’वरून केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांचा इशारा

जालियानवालाबागमध्ये जनरल डायरने ज्या पद्धतीने गोळीबार केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील त्याच पद्धतीने देशातील नागरिकांवर गोळीबार करत आहेत. अमित शहा जनरल डायरपेक्षा कमी नाहीत, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच उद्गार खरेच आहेत, असं मलिक म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या