राम मंदिर तुम्ही बांधता का आम्ही बांधू असा भाजपाला सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू अाहे. रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन इथं यासाठी एक बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेकडून हर हिंदु की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार असा नवा नारा देण्यात आला.
राम मंदिर बांधण्याचं आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजपानं चार वर्षात राम मंदिर बांधण्यासाठी काहीच केलं नाही, असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाण्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार २४ आणि २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. तिथं उद्धव ठाकरे अयोध्येतील लोकांशी संवाद साधत राम मंदिर बांधण्याच्यादृष्टीनं जनतेची, अयोध्यावासियांची काय भूमिका आहे याची चाचपणी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुसार अयोध्येत उद्धव ठाकरे रॅली घेणार असून महाआरतीही करणार असल्याचं समजतं. दरम्यान मुंबईतून २५००० शिवसैनिक अयोध्येत जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
एकूणच या दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार असून हा दौरा यशस्वी करणाऱ्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेतील नेत्यांची मोठी फळीही कंबर कसून कामाला लागली आहे. या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावर असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्याअनुषंगानं आता उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यासाठी नवा नारा दिला आहे. तो म्हणजे हर हिंदु की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार. उद्धव ठाकरे यांचा हा नवा नारा लक्षात घेता येत्या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा असणार याचेच संकेत असल्याची चर्चा आता यानिमित्तानं सुरू झाली आहे.
अयोध्येला जाण्यासाठी तयार असलेल्या शिवसैनिकांमध्ये युवासेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पण रविवारी उद्धव ठाकरे यांनी युवासेना आणि महिला आघाडीनं अयोध्या दौऱ्यावर येऊ नये असे आदेशच दिल्याचं समजतं.
हेही वाचा -
एसई-बीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण, मुख्यमंत्र्यांची अधिवेशनाआधीच मोठी घोषणा
फडणवीस, उद्धव 'ठग्ज आॅफ महाराष्ट्र'; विरोधकांची अनोखी पोस्टररबाजी