मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल रविवारी अधिवेशनापूर्वीच्या मंत्रीमंडळ बैठकीत सादर झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार आयोगाच्या शिफारशींवर चर्चा सुरू झाली असून पुढील वैधानिक कार्यवाही सुरू असून लवकरच आरक्षणाचा निर्णय जाहीर होईल.
तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता नवा एसई-बीसी (सोशली इकाॅनाॅमिकली बॅकवर्ड क्लास) प्रवर्गांतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला ज्या मोठ्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी अधिवेशनाआधीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक मागास असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी पात्र आहे. कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देता येईल, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. या तिन्ही शिफारशी मंत्रीमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शिफारशीनुसार मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार मंत्रीमंडळाची उपसमिती लवकरच यासंबंधीचा निर्णय घेत आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकाली निघेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देण्यात येणार आहे. तर यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मागास आयोगाची परवानगी घेण्याची कोणतीही गरज नाही. त्यामुळं आरक्षणाचा निर्णय लवकरच होईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे. तर आरक्षणासाठी एसई-बीसी असा नवा प्रवर्गही तयार करण्यात येणार आहे.
चहापानावर बहिष्कार टाकत ठग्ज आॅफ महाराष्ट्र, ठगबाजीचे चार वर्षे अशी पोस्टरबाजी करत सत्ताधाऱ्यांची खिल्ली विरोधकांनी उडवली आहे. गॅँग अाॅफ वासेपूर असा विरोधकांचा उल्लेख करत या खिल्लीलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उत्तर दिलं आहे. विरोधकांकडे मुद्दे नाहीत, त्यामुळं फिल्मी स्टाईल पोस्टरबाजी करत आहेत. सरकार आरक्षणासह, दुष्काळाच्या मुद्यावर गंभीर आहे. त्यादृष्टीनं योग्य ती पावलं उचलली जात आहेत. त्यामुळं विरोधकांनी राजकारण करू नये आणि पोरकटपणा सोडावा असा प्रतिटोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.
हेही वाचा -
सरकारनं जनतेला ठगवलं, विरोधकांचा आरोप
फडणवीस, उद्धव 'ठग्ज आॅफ महाराष्ट्र'; विरोधकांची अनोखी पोस्टररबाजी