भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.
भारिप बहुजन महासंघ या नावाशी आपलं एक भावनिक नातं असल्याचं मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच यापुढील वाटचाल वंचित बहुजन आघाडीतूनच करण्यात येणार आहे. सध्या देशात दबावतंत्र आणि ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू आहे. स्मृती इराणी यांनी गांधी परिवारावर घोटाळ्याचे केलेले आरोप हे दबाव आणि ब्लॅक मेलिंगचा प्रकार असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.
तसंच घोटाळ्यांची माहिती असतानाही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसंच आगामी लोकसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली लढवणार असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेससोबतच्या संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असून राज्यातील ४८ मतदारसंघातून उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवीणार असल्याचं आंबेडकर यांनी जाहीर केलं. तसंच यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने २२ उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरीत २६ जागांसाठीच्या १५ मार्च रोजी उमेदवार जाहीर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा -
भाजप-शिवसेनेने काँग्रेससाठी 'हक्काचे पाळणाघर' करू नये, शिवसेनेचा भाजपला सल्ला