Advertisement

भाजप-शिवसेनेने काँग्रेससाठी 'हक्काचे पाळणाघर' करू नये, शिवसेनेचा भाजपला सल्ला

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये असा सल्ला शिवसेनेने मुखपत्र 'सामना'तून भाजपला दिला आहे.

भाजप-शिवसेनेने काँग्रेससाठी 'हक्काचे पाळणाघर' करू नये, शिवसेनेचा भाजपला सल्ला
SHARES

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांच्या फोडाफोडीला उधाण आलं आहे. दोन दिवसांपुर्वी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा पुत्र सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, भाजपा किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचं ‘पाळणाघर’ होऊ नये असा सल्ला शिवसेनेने मुखपत्र 'सामना'तून भाजपला दिला आहे. 


काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचं पाळणाघर

भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचं ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी आहेत. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल आणि ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळं आपली माणसं आणि मूळ विचारच खरा. तरीही तरुण तडफदार सुजय विखे-पाटील यांच्या नव्या कारकीर्दीस आम्ही शुभेच्छा देत आहोत. तुम्ही आलात, आनंद आहे, अशा शब्दात शिवसेनेनं सुजय विखे पाटलांचं स्वागत केलं. 


राजकीय भूकंप

सुजयपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या पक्षांतील अनेकजण भाजपच्या दारात रांगा लावून उभे आहेत आणि त्याचा आनंद मुख्यमंत्री व इतर मंडळींच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यात चंद्रकांत पाटील यांनी अशीही घोषणा केली आहे की, राज्यात सात-आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होईल. चंद्रकांत पाटील यांच्या या संभाव्य भूकंपाच्या घोषणेनंतर राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन सतर्क झाले असेल. या भूकंपाचा केंद्रबिंदू नक्की कुठे आहे, भूगर्भातील हालचाली कुठे व कशा सुरू आहेत याचा अंदाज येत्या काही दिवसांत येईल. विखे-पाटील घराण्याप्रमाणे मोठी राजकीय घराणी भाजपाच्या गळाला लागतील आणि भाजपा हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष बनेल. त्या दिशेने हिंदुत्ववादी विचाराचे धुरीण कामास लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असेल तर ते चुकीचे आहे, अशी भूमिका सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मांडली आहे.



हेही वाचा -

दुसऱ्यांना धुणीभांडी करण्यासाठी वापरून घेत नाही; उद्धव यांचा शरद पवारांना टोला

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास करा ऑनलाईन तक्रार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा