‘राज यांच्या ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पण्ण होईल, असं वाटत नाही’, असा विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे.
काेहिनूर इमारतीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी (ED)ने नोटीस पाठवून २२ आॅगस्ट रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. यामुळे मनसैनिक चांगलेच खवळले असून ते सत्ताधारी भाजपावर सुडाच्या राजकारणाचा आरोप करत आहेत.
काँग्रेस (congress), राष्ट्रवादी (ncp)सह अन्य पक्षांतील नेते राज (raj thackeray) यांच्या पाठिशी उभे राहिले असताना भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची याप्रकरणी नेमकी भूमिका काय? असा प्रश्न सर्वांना पडला होता. यावर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं.
काँग्रेस नेत्या निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी नुकताच मातोश्री निवासस्थानी शिवसेने (Shiv sena)त प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ईडीच्या चौकशीबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला, त्यानंतर त्यांनी आपलं मत मांडलं. मात्र या विषयी त्यांनी जास्त बोलण्यास नकार दिला.
राज यांना ईडीने चौकशीसाठी २२ आॅगस्टला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. याच दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे बंद करून ईडीच्या कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन करण्याचं ठरवलं होतं. मात्र लोकांना त्रास होईल, असं कुठलंही वर्तन करू नका, अशी विनंती केल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी ‘ठाणे बंद’चा इशारा मागे घेतला आहे.
हेही वाचा-
चूक नसेल, तर घाबरण्याचं कारण काय? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला