खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करून जर कुणी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. याविरोधात अन्न व औषध विभागाची मोहीम अधिक तीव्र करण्याबरोबरच खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत, याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.
खाद्य तेलातील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना, भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती, भेसळ करणारी दुकाने, कंपन्या, आस्थापना, दुकानदारांवर धाडी टाकून कडक कारवाई करावी. तसेच खाद्य तेलात वारंवार भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे अन्न परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्र्यांनी दिले. याबरोबरच मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण या विभागांचा आढावा घेतला.
हेही वाचा- ‘हाफकिन’ने लस संशोधनाला प्राधान्य द्यावं- उद्धव ठाकरे
या बैठकीस अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सह सचिव शिवाजी पाटणकर, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे सहआयुक्त शैलेश आढाव, बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, कोकण विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख, पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे, औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त उदय वंजारी, अमरावती विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त महेश चौधरी, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना वानरे आदी उपस्थित होते.
(take strict action against food adulteration directs rajendra patil to fda)