राज्यसभेतही आरक्षण असलं पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (RPI.A.)चे प्रमुख रामदास आठवले यांनी मंगळवारी केली.
सह्याद्री अतिथीगृह इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की, लोकसभेत ज्याप्रमाणे मागासवर्गीय प्रतिनिधींसाठी राखीव जागा असतात. त्याचप्रमाणे राज्यसभेतही मागासवर्गीयांसाठी जागा असल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांना राज्यसभेतही प्रतिनिधीत्व करता येईल तसंच राजकारणातील मुख्य प्रवाहात येता येईल.
लोकसभेत विविध मागास जातींसाठी जागा आरक्षीत असतात. या जागांवर निवडून येत त्या त्या जातीचे खासदार आपल्या समुदायाचं प्रतिनिधीत्व करतात. त्याचप्रमाणे राज्यसभेसाठी देखील वेगवेगळ्या राज्यांतून विविध जातींसाठी जागा आरक्षीत केल्या पाहिजेत. विधान परिषदेतही हेच सूत्र असावं. जेणेकरून मागासवर्गीय नेत्यांना राजकारणातील मुख्य प्रवाहात येता येईल.
रामदास आठवले यांनी जातीआधारीत जनगणनेचं देखील समर्थन केलं. ते म्हणाले, जाती आधारीत जनगणना केल्यास सामाजिक वातावरण दूषित होईल, हे मत चुकीचं आहे. जातीच्या आधारे जनगणना झाल्यास देशभरात किती टक्के मागासवर्ग आहे, याचा निश्चित आकडा आपल्याला प्राप्त होऊ शकेल. त्याआधारे या मागासवर्गातील लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवता येतील.
हेही वाचा-
रामदास आठवलेंना पाहिजे विधानसभेच्या १० जागा
मी जिथं जातो तिकडचं पारडं जड होतं- राणे