येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती होवो अथवा न होवो मी भाजपात जाणार हे नक्की असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेचं राणे यांनी सिंधुदुर्गात स्वागत केलं, यावेळी ते बोलत होते.
भाजप-शिवसेनेची युती झाल्यास सेनेच्या दबावामुळे नारायण राणेंना भाजपात प्रवेश देण्यात येणार नाही. तर भाजप स्वबळावर लढल्यास राणेंचा हमखास पक्षप्रवेश होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, शिवसेना-भाजपचं काहीही ठरलं तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मी ज्या दिशेने जातो तिकडचं पारडं जड होतं. त्यामुळे मी भाजपमध्ये गेल्यावर भाजपचंही पारडं जड होणार असल्याचं ते म्हणाले. एवढंच नाही तर नितेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमानचे कार्यकर्ते देखील भाजपच्या तिकीटावरच विधानसभा निवडणूक लढणार आहेत. भाजपमध्ये जाण्यासाठी कोणतीही अट ठेवली नसून विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा-
हेच पळपुटे, कुठून तरी तुमच्या तंबूत शिरले होते, शिवसेनेची पवार यांच्यावर टीका
भुजबळांना शिवसेनेत ‘नो एण्ट्री’- संजय राऊत