रक्ताळलेल्या, भेगाळलेल्या आणि प्रचंड थकलेल्या पायांनिशी हजारो शेतकरी बांधव लाँग मार्च करत १८० किलोमीटरची पायपीट करून मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या रास्त मागण्यांसाठी थेट विधानभवनावर धडकण्याचा निर्धार त्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला पाचारण करून विधानभवनात चर्चाही सुरु केली आहे. मात्र, शेतकऱ्यांचं हे सगळं आंदोलन अर्बन माओइझम अर्थात शहरी नक्षलवादाचा परिणाम असल्याचा भयंकर शोध सत्ताधारी भाजपाच्याच एक खासदार पूनम महाजन यांनी लावला आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूनम महाजन यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. त्यामुळे सर्व संकटांचा सामना करत आणि कडक उन्हातही पायपीट करून मुंबईत अलेल्या शेतकऱ्यांचा मुंबईच्याच खासदार पूनम महाजन यांनी अपमान केल्याची भावना व्यक्त होत आहे.
लोकशाहीमध्ये आंदोलनं होत आली आहेत. मात्र, या शेतकऱ्यांच्या हातात लाल फीत आणि कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा आहे, त्यावर विचार करावा लागेल. देशभरात अर्बन माओवाद वाढतोय. महाराष्ट्रात खासकरून पुण्यातून तो सुरू झाला. आपल्याच टॅक्सच्या पैशांवर शिकलेले चाळिशीत पीएचडी करणारे कम्युनिस्ट विचारांचे तरूण नक्षलग्रस्त भागात जाऊन शिक्षणाच्या विरोधात काम करणं, तिथल्या लोकांना भरकटवणं अशी कामं करत आहेत.
पूनम महाजन, खासदार, भाजप
सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणं महत्त्वाचं आहे असं सांगतानाच पूनम महाजन यांनी अप्रत्यक्षपणे या आंदोलनामागे माओवादी विचारांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या वाक्यांचा दुसरा अर्थ असा होतो की हे सर्व शेतकरी त्यांच्या स्वत:च्या इच्छेने न येता कुणीतरी त्यांना उद्युक्त केलं म्हणून मोर्चा काढून आले. त्यामुळे पूनम महाजन यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
शेतकऱ्यांना माओवादी म्हणालात याची शरम वाटली पाहिजे. तुम्हाला या देशावर राज्य करण्याचा नैतिक अधिकारच नाही. पूनम महाजन आणि भाजपने शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे.
अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
हेही वाचा
काठीहल्ला करा नाहीतर गोळ्या घाला, आता माघार नाही! शेतकऱ्यांचा निर्धार