महिलांना हवीय विशेष बससेवा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच खासगी आस्थापनांमध्ये काम करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या देखील आता वाढू लागली आहे. या महिलांना आपल्या कार्यालयांपर्यंत सुलभरित्या पोहोचता यावं, यासाठी महिला विशेष बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. (women and child development minister yashomati thakur demands ladies special bus in mumbai)

राज्य सरकार मिशन बिगीन अगेन अंतर्गत दैनंदिन व्यवहारांना टप्प्याटप्प्याने परवानगी देत असल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळू लागली आहे. अशा स्थितीत शासकीय, खासगी अशा सर्वच क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी आता उपलब्ध वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करू लागले आहेत. 

मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसंच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी बहुतेक महिला प्रवाशांची मागणी आहे.

हेही वाचा - अखेर 'या' कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली

त्यानुसार ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे यासंदर्भात मागणी केली आहे. संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सर्व अत्यावश्यक सेवेतील शासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचारी विशेषतः महिलांनाही कार्यालयात किंवा कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. केंद्र शासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्यू-आर कोडसहित पासची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तथापी, बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्यू-आर कोड पास उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे पर्यायाने त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसने प्रवास करावा लागत आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

बसने प्रवास करण्याकरिता दररोज तास- दोन तास बसची प्रतीक्षा तसंच बस उपलब्ध झाल्यानंतरही त्यांना दोन-तीन तास प्रवास बसने करावा लागत आहे. विशेषतः महानगरमध्ये बसने येण्याजाण्यास खूप अडचणी येत आहे. तसंच बससेवेला होत असलेली गर्दी पाहता त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय व खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणे गरजेचं आहे, असे ॲड. ठाकूर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - कोरोनामुळं प्रवाशांची शिवनेरी बसकडे पाठ, केवळ १० ते १५ टक्केच प्रतिसाद

पुढील बातमी
इतर बातम्या