राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केलीय. ५ ऑक्टोबरला मतदान तर ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसाठी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसंच पालघर जिल्हा परिषदेच्या आणि त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल. सर्व ठिकाणी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस मदान यांनी केली.
पालघर जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. २१ सप्टेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल.
पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता.
आता पालघरसह सर्व ठिकाणी २१ सप्टेंबर २०२१ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी २७ सप्टेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील, असं त्यांनी सांगितलं. अपील असलेल्या ठिकाणी २९ सप्टेंबर २०२१ पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील.
जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण १४४ निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
किती जागांसाठी निवडणूक
किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?
नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?
दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात कुठल्याही निवडणुका नको अशी भूमिका विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह सत्ताधारी महाविकास आघाडीनं घेतली आहे. मात्र, आता निवडणुका जाहीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा